चासमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान   

मंचर, (प्रतिनिधी) : चास (ता. आंबेगाव) येथे ढगफुटीसदृश्य पाऊस सोमवार आणि मंगळवारी झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतींचे बांध फुटले असून पिके जमीनदोस्त झाली आहेत. चास-घोडेगाव रस्त्यावरील तात्पुरता उभारलेला पूल वाहून गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.चास येथे जोरदार वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. आटकमळा, गणेशवाडी, शेगरमळा, कडेवाडी आणि चास पंचक्रोशीतील शेतीचे बांध वाहून गेले आहेत. 
 
चास-घोडेगाव रस्ता चार ठिकाणी खचला आहे. याच रस्त्यावरील चिंचोली आणि चास गावाच्या शिवेवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पूल तयार करून वाहतूक सुरु करण्यात आली होती. परंतु ओढ्याला आलेल्या पुरात पूल वाहून गेला आहे.मुरूम टाकून तात्पुरता रस्ता सुरु केला आहे. कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी येथे वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस झाला. पावसाचा फटका शेतीसह वीटभट्टी मालकांना बसला. वादळी वार्‍यामुळे काही वीटही भिजल्या आहेत. काढणीला आलेले बाजरी पीक जमीनदोस्त झाले आहे. तर आंबेही जमिनीवर गळून पडले आहेत. 
 
मेथी, कोथिंबीर व तरकारी पिकांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिके सडून जाण्याच्या धोका निर्माण झाला आहे. शेताच्या बांधावर आरण लावून ठेवलेला कांदाही भिजला आहे. कळंब-चांडोली बुद्रुक रस्त्यावर धरणमळा येथे लिंबाचे झाड कोसळले आहे. दीपक किसन बारवे यांनी कांदा साठवून ठेवला होता. मुसळधार पाऊस झाला. या पावसाने दगडी ओढ्याला पूर आला. या पुरात बारवे यांनी साठवणूक केलेला काही कांदा वाहून गेला आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
 

Related Articles